शंकरगीता अध्याय १२ वा

ग्रंथ - पोथी  > शंकरगीता Posted at 2018-12-05 17:21:10
शंकर गीता अध्याय १२ वा अगाध ज्यांची असे करणी । अतर्क्य ज्यांची विचारसरणी ज्यांनी रुढीला घातली गवसणी । वंदन त्यांना त्रिवार ।।१।। महाराज देशोदेशी जात । दर्शनास गर्दी उसळत ।। लोक अनेक प्रश्न विचारीत । महाराजांना भक्तीने ।।२।। प्रत्येक प्रश्नावर महाराज । प्रदीर्घ प्रवचन करीत ।। विद्वत्ता त्यांची कळून येत । मुद्देसूद प्रवचन ।।३।। जणू ज्ञानाचा वाहे झरा । विचारांचा सुसाट वारा ।। कल्पनांचा भव्य भारा । रूढी उखडून टाकली ।।४।। ऐशी महाराजांची प्रवचने । प्रमुदित होत श्रोतृमने ।। प्रवचनांचीही विविध स्थाने । सारांशरूपे ऐकू या ।।५। श्रीशंकरमहाराज उवाच । सुख - शांती समाधान ।। सर्वांनाच हे हवे असून । त्यास्तव धडपड चालली ।।६।। सुख, शांती, समाधान । म्हणजे नक्की काय असून ।। हे आधी घ्या समजून । सुख कशाला म्हणतात ।।७।। ज्यामुळे असुख निर्माण होऊन । मन:शांती जाते बिघडून ।। असे अडथळे दूर सारून । सुख: शांती मिळतसे ।।८।। इच्छा, ईर्ष्या, असूया, वासना । महत्वाकांक्षा हावरेपणा अतृप्ती, विविध कामना । जीवन गढूळ याने हो ।।९।। त्यामुळे सुख - शांती - समाधान । या गोष्टी नष्ट होऊन ।। ग्रंथ पुराणे वाचून । पांडित्य तुम्हा लाभेल ।।१०।। अहंकार होईल निर्माण । त्यामुळे न मिळणार समाधान ।। सुखदु:खाचे मूळ जाण । मनाच्या अस्थिरतेमध्ये ।।११।। जितक्या तटस्थपणाने । मनाच्या सूक्ष्म हालचालीचे ।। निरीक्षण करून, समजून घेण्याचे । प्रयत्न जेवढे कराल ।।१२।। तेवढ्या प्रमाणात समस्यांची । उकल होईल पहा त्यांची ।। आत्मसंशोधन हा त्यावरती । उपाय आहे एकच ।।१३।। दुस-याचे मार्गदर्शन । गुरू, मंत्र, ग्रंथ, पुराण ।। उपयोग यांचा मुळीच नसून । शुध्द वंचना असे ही ।।१४।। जग झपाट्याने असे बदलत । जीवनमूल्ये बदलत सतत ।। गुरू शब्दास जुन्या जमान्यात । महत्त्व होते आगळे ।।१५।। सामाजिक, धार्मिक, नैतिक । अधिष्ठान होते गुरू शब्दात ।। आता त्याचा मागमूसही नसत । महत्व गेले लयाला ।।१६।। पूर्वीच्या जीवनात । भौतिकतेला स्थान नसत ।। आजच्या जीवनात असत । भौतिकतेलाच महत्व ।।१७।। आजची जीवनमूल्ये सारी । भौतिक सुखे मिळतील कशी ।। या एकाच कसावरती । पारखली जातात ।।१८।। पूर्वीच्या जीवनात । ज्या विचारसरणीने सुखी शांत ।। जीवन समाधानी बनत । समृध्द होत असेच ।।१९।। त्या विचारसरणीचा बळी देऊन । नवी भौतिक जीवनपध्दत ।। स्वीकारली आहे आपण । शाश्वत मूल्ये विसरलो ।।२०।। गुरू, ग्रंथ, मंत्र, उपदेश । यांचा पूर्वी घनिष्ट संबंध ।। आजच्या भौतिक विचारसरणीत । महत्व त्यांचे नच उरले ।।२१।। सध्या भक्ती कशाशी खातात ? । श्रध्दा म्हणजे काय असत ? प्रेम कशाला म्हणतात ? । पैसा धर्मच आजचा ।।२२।। सत्य नीती सदाचार । हे पदार्थ असू शकतात काय ? ।। यांचा जेथे पत्ताच नसत । तिथे गुरू उपदेश कैसा कळे ? ।।२३।। सध्या अडचणी निवारण्यास । गुरू हवाय सर्व लोकांस ।। अडचणी दूर न झाल्यास । चालले दुस-या गुरूकडे ।।२४।। सध्या गुरू या शब्दाला । बाजारीपणा आहे आला ।। गुरूची आवश्यकता न लोकाला । अडचणी - निवारक गुरू हवा ।।२५।। ऐहीक अडचणींच्या वेळी । उपयुक्त उपयोगी पडणारी ।। गुरू ही संस्था मुळीच नाही । किंवा नव्हे उतारा ।।२६।। सत्यश्रध्दा, समर्पणबुध्दी । भक्ती प्रेम आनंदमयस्थिती ।। यांचा तुम्हाला अनुभव नाही । आजचे गुरूही असेच ।।२७।। आंधळ्याला आंधळ्याने । मार्गदर्शन करावयाचे ।। काय होईल दोघांचे ? । दोघे आंधळे जाणोत ।।२८।। स्वत:चे गुरू व्हावे स्वत:च । सर्वांत उत्तम मार्ग आहे हाच ।। तुमच्या सुखाच्या आड तुम्हीच । निर्माण करता अडथळे ।।२९।। कुणाच्याही कच्छपी लागू नका । गुरू या खुळात अडकू नका ।। हेतू न मम ‘गुरूवर टीका’ । उद्देश समजून घ्या मम ।।३०।। आपल्या समस्या विचारपूर्वक । आपण जर सोडवू शकाल ।। कोणताच प्रश्न कठिण नसत । अनुभव याचा येईल ।।३१।। गुरू शोधावा नाही लागत । गुरूच शिष्य पारखून निवडत ।। अज्ञान नष्ट करून ज्ञान देत । भाग्यवान हे शिष्य हो ।।३२।। असे शिष्य आपल्या जीवनात । गुरूला सर्वोच्च स्थान देतात ।। गुरूस्तव वाटेल तो त्याग करतात । गुरूस ईश्वर मानती ।।३३।। गुरूवर विश्वास उतुंग अढळ । गुरूच्या ज्ञानाबाबत ।। कर्तुमकर्तुम शक्तीबद्दल । संदेश नसतो मुळीच ।।३४।। गुरूलाही शिष्याचे कल्याण कशात । हे पूरेपूर असते माहीत निरपेक्षपणे साधून शिष्याहित । उध्दार त्याचा करीतसे ।।३५।। अपेक्षित साध्य असे अंत:स्थिती । अनुभव शब्दाने व्यक्त न होती ।। अनुभव शाब्दिक मूळीच नसती । ग्रंथोपयोग काय मग ? ।।३६।। श्रध्दा म्हणजे ठाम विश्वास । जीत कसलीच अपेक्षा नसत ।। तीत कधीच बदल न होत । अविचल स्थिती अशी मनाची ।।३७।। अशी अविचलित भक्ती तुमची । आहे का कोणा देवावरती ? ।। म्हणता देव सर्वशक्तिमान सर्वव्यापी । मूर्तिपूजा मग का करता ।।३८।। कारण सत् चिद्घन परमेश्वरावर । पूर्ण श्रध्दा असेल तर ।। चैतन्यस्वरूप ईश्वराशिवाय तर । मूर्तिपूजा व्यर्थच ।।३९।। ईश्वर ज्याला । त्याला त्याच्या रागालोभाचा ।। ईश्वरास संतोष देण्याघेण्याचा । प्रश्नच नाही उद्भवत ।।४०।। तुम्ही देवास्तव जे जे बोलता । आणि प्रत्यक्षात जे जे आचरता ।। त्यामागे कुठलीच वैचारिक भूमिका । नाही, केवळ विसंगती ।।४१।। म्हणून माझे सांगणे तुम्हाला । यात अडकवून घेऊ नका स्वत:ला ।। मनाचा मागोवा घेण्याचा । योग्य प्रयत्न कराच ।।४२।। विष घेतले तर मरून जाल । उडी टाकू नका जळत्या चितेत ।। कोणी सांगितले हे तुम्हास ? । सांगा गुरू कोण हा ? ।।४३।। कितीतरी गोष्टी जीवनात । गुरूशिवाय आपण असतो करत ।। विचारपूर्वक आचरणाचे फलित । निश्चितपणे असे हे ।।४४।। ज्या क्षणी याल आत्मबोधावर । त्या क्षणी घडेल आत्मसाक्षात्कार ।। आत्मजागृती नि अनुभव यात तर । क्षणालाही स्थान नसे ।।४५।। साधनमार्गात अपेक्षा नि पूर्ती । अध्याहत अपरिहार्य असती ।। त्यांचा शेवट निराशा विफलतेत अती । होणेच ठरते सुसंगत ।।४६।। शिकलेला मनुष्य हा जास्तच । असमाधानी असावयाचाच ।। नारळाचे पाणी जितके गोडच । तिते खोब-याची चव कमी ।।४७।। जेवढी विद्वता असे जास्त । तेवढी निष्ठा कमी असत विद्वान लोकांना पहा सतत । कल्पना जास्त स्फुरतात ।।४८।। फार चिकित्सा करण्यात । नुकसानच होत असत ।। म्हणून चिकित्सा मर्यादेत । अल्प अगदी असावी ।।४९।। कल्पनेचे खरे - खोटेपण । अनुभवानीच कळते म्हणून ।। अनुभवानंतर तत्क्षण । कल्पना थांबली पाहिजे ।।५०।। आपल्या अंतरंगात डोकावणे । निरीक्षण व श्रध्देत मानवाचे ।। जीवन तात्काळ बदलून टाकण्याचे । असीम आहे सामर्थ्य ।।५१।। तुमच्या प्रत्येक कृतीत । अपेक्षा स्वार्थ दडलेला असत ।। पत्नीकडूनही अपेक्षा असतात । निरपेक्ष नि:स्वार्थ कुणी नसे ।।५२।। अपेक्षा स्वार्थ करण्याकरता । तुम्ही मित्रांना मदत करता ।। समाजकार्ये दानधर्म करता । कीर्ती प्रतिष्ठा मिळावी ।।५३।। तुमच्या देणगीचे होता कौतुक । दानधर्माचा जेव्हा उदोउदो होती ।। तेव्हाच तुम्हास बरे वाटत । अन्यथा तुम्ही खवळता ।।५४।। हा अहंकारच आपल्या जीवनात । जे जे भव्य अन् उदात्त ।। त्याच्या आड असे येत । हे आत्मसंशोधन करता कळेल ।।५५।। आशा, इच्छा, हव्यास, वित्त । कधी न शेवट यांना जीवनात ।। सर्वोच्च बिंदू अस्तित्वात । या गोष्टींचा नसेच ।।५६।। बोटीतून प्रवास करावयाचाच । तर बोट डोलणार हलणारच ।। मळमळ ओका-या बोट लागणारच । सहन केलेच पाहिजे ।।५७।। विवाह झाल्यावर सर्वांना । मूल व्हावे, इच्छितांना ? ।। डोहाळ्यांचा त्रास प्रसूतिवेदना । कशा टाळता येतील ? ।।५८।। त्याप्रमाणे ऐहिक जीवनात । कटकटी चुकविता येणार नाहीत ।। जोपर्यंत हे शरीर असत । तोपर्यंत त्याच्या व्याधीही ।।५९।। कोणी मला विचारतात । तुम्ही आम्हाला काय दिले असत ? ।। न मागताच मी असे देत । मागण्याची जरूरी का ? ।।६०।। जी घटना घडलेली घडत । तीच मी दिलेली असत तुम्ही मागितले, मी दिले नसत । ऐसे काय सांगा ते ।।६१।। कशाचीही गरज न ज्याला । इच्छित नाही पदार्थ कसला ।। कधी न पैशाच्या मागे तो लागला । संग्रहाचा न हव्यास ।।६२।। ते कुणाची न करती स्तुती । कुणाची मेहेरबानगी न संपादती ।। अप्रसिध्द अज्ञात असे असती । निर्भय ब्रह्मानंदात ।।६३।। व्यक्तिश: मला कशाची गरज नसत । मला हवे, असे काहीच नसत ।। दु:खी असमाधानी मुळीच नसत । मन:शांती कधी ढळत नसे ।।६४।। मजजवळ काही न गमावण्यासारखे । काहीच नसे मिळविण्यासारखे ।। ईश्वराने जे जे असे निर्मिले । त्यात माझ्यात फरक ना ।।६५।। जे समजल्याने जगात । समजण्यासारखे काही न उरत ।। अशा मनाच्या स्थितीत म्हणतात । सत्य - आत्मदर्शन ।।६६।। जे नाही, ते मिळवावयाचे । अशा स्वरूपाचे साध्य नाही ते ।। ज्याचे स्वरूपच अनिश्चित जिथे । नेतिनेति वेद म्हणतात ।।६७।। रूढीचे ओझे बुध्दीवर नसेल । तेव्हाच बुध्दीस स्वातंत्र्य मिळेल ।। आत्मसंशोधनाचे सामर्थ्य वाढेल । महान अनुभव येतात ।।६८।। हे जे अनुभव येतात । हा जो साक्षात्कार असे घडत ।। हे जे आत्मदर्शन होत । देव यालाच म्हणतात ।।६९।। ऐकावे जिवाचा करून कान । लक्षपूर्वक करावे निरीक्षण ।। त्यामुळे प्रगल्भ प्रचोदायी महान । हुकुमी अनुभव येतात ।।७०।। अष्टेंद्रिये शरीरात हालचाल करीत । अशा या निर्विकल्प स्थितीत ।। माणसाला आत्मदर्शन घडत । आत्मानुभव याला म्हणतात ।।७१।। ब्रह्म चैतन्यरूप अविनाशी असत । त्याला जन्ममृत्यू मुळीच नसत ।। ज्याला जन्ममृत्यू आदि असत । मायारूप सर्व ते ।।७२।। ज्ञान अनुभवांच्या समन्वयाने । मायेपासून सुटका होते ।। ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या असे । वचन प्रसिध्द असेच ।।७३।। ज्यांना प्राप्त झाले खरे ज्ञान । सत्याचे झाले दर्शन ।। जाणले जीवनाचे सर्व पैलू छान । अवतार त्यांना म्हणतात ।।७४।। सर्व अवतारी पुरूषांची शिकवण । आणि अनुभव एकच असून ।। पध्दतीत फरक येतो दिसून । काळ - स्थितीप्रमाणे ।।७५।। संताची विचारधारा शिकवण । सर्वच अगदी एकच असून ।। भक्त विसरतात शिकवण । माजवतात अवडंबर ।।७६।। जाणीव आणि नेणीव । मनाच्या दोन अवस्था असत ।। जाणिवेत असतो अहंभाव जागृत । नेणिवेत अहंभाव नसतोच ।।७७।। या दोन अवस्थांच्या पलिकडे । उच्च अवस्थेत मन जेव्हा जाते ।। पूर्ण चेतन ज्ञानातील ही अवस्था असे । समाधी याला म्हणतात ।।७८।। समाधी केव्हाही लावता येते । कार्य संपल्यावर समाधी घेता येते ।। समाधी लावणे, समाधी घेणे । वेगळे दोन प्रकार हे ।।७९।। मी जे असतो बोलत । त्याचप्रमाणेच सर्व घडून येत ।। मी सिध्दीच्या मागे नसत । सिध्दीच्या मागे लागू नका ।।८०।। मिळाले त्याचा आनंद लुटा । अप्राप्याच्या मागे धावू नका ।। भगवंताने अनेक गोष्टी दिल्या । उपभोगसामर्थ्यही दिलेच ।।८१।। ते सोडून वेगळ्याकडे धावणे । सिध्दीच्या मागे न लागणे ।। हीच सिध्दी प्राप्त होणे । अत्यंत महत्वाचे असे हे ।।८२।। मानवी शरीर ही महासिध्दी । त्यात आपणास दिली बुध्दी ।। जड फायदे देते सिध्दी । आपणा जडापलीकडे जायचे ।।८३।। सिध्दीपेक्षा श्रेष्ट भक्ती । सर्व संताची हीच उक्ती ।। सिध्दीने मिळत नसे मुक्ती । मुक्तीचा मार्ग भक्तीच ।।८४।। सोपे असे नुसते वाचणे । महत्वाचे भवसागरातून वाचणे ।। असेल दु:खातून बाहेर पडणे । वाचण्याप्रमाणे कृती हवी ।।८५।। रत्नजडित मुगुट राजांच्या डोक्यावर । परी समाधान न तिळभर ।। समाधानाचा मुगुट ज्यांच्या हृदयावर । तेच राजे खरे हो ।।८६।। निर्गुण परमेश्वराचे रूप सगुण । प्रत्यक्ष आई - वडील घरी असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून । देवामार्गा लागता ।।८७।। म्हणून समाधान मिळत नाही । घरीच आई वडीलाची ।। मनोभावे सेवा करा तुम्ही । समाधान येईल चालत ।।८८।। आत्मसाक्षात्काराकरिता । शास्त्र, गुरूपासून आत्मा अनात्मा ।। यांचे स्वरूप समजावून घेण्याला । ज्ञान ऐसे म्हणतात ।।८९।। अष्टांगाच्या अभ्यासाने । चित्ताचा निरोध करणे ।। प्रयत्नपूर्वक हे आचरणे । योग्य याला म्हणतात ।।९०।। अज्ञानाने देह - आत्मा या दोघांच्या । अन्योन्याध्यासात ये उदयाला ।। हात घालून वेगळे करतो दोघांना । विवेक त्याला म्हणतात ।।९१।। असा विवेक जागा रहावा सदैव । मी शरीर नसून आत्मा असत ।। असणे असा विचार अंत:करणात । यालांच तप असे म्हणतात।।९२।। दु:खिताला होणारे दु:ख । कारूण्याने नाहीसे असता करत ।। सुष्ट दुष्ट हा न करणे भेद । दया याला म्हणतात ।।९३।। कर्मंद्रियाचे व्यवहार । बंद पडतात प्राण जिंकल्यावर ।। बंद होतात ज्ञानेद्रिये व्यवहार मनोनिग्रह केल्याने ।।९४।। सर्व ओझे सहन करीत असताना । सहन करण्याच्या अभिमानाला ।। मुळेच स्पर्शन होणे याला । क्षमा ऐसे म्हणतात ।।९५।। दुस-यास क्षमा केली तर । आतून आनंद - राशी प्रगटतात ।। क्षमेचा निर्भेळ हा आनंद । चिरकाल असतो टिकणारा ।।९६।। आध्यात्मिक आधिभौतिक । आधिदैविक संकटे आकस्मिक ।। येता धारक शक्तीने जो पचवित । धैर्य त्याला म्हणतात ।।९७।। निष्काम धर्माचा आचार । अंतरी आत्मानात्म विचार ।। अंगी मुरलेत खरोखर । शौच याला म्हणतात ।।९८।। साधण्यासाठी स्वत:चे हित । इतरांचे न करणे मुळीच अहित ।। न करणे प्रयत्न निंद्य कलुषित । याला अद्रोह म्हणतात ।।९९।। सद्गुणामुळे नयोग्य असुनी । मान दिला असता लोकांनी लज्जित होणे विनयांनी । अमानित्व याला म्हणतात ।।१००।। अशा या सदगुणांची सतत । वाढ व्हायला हवी असत ।। त्यामुळे दडलेले माणसात । देवत्व प्रकट होतसे ।।१०१।। त्याचे आंतर्बाह्य जीवन । निघेल अगदी उजळून ।। कृतार्थ होईल जीवन । धन्य होईल मानव ।।१०२।। मी राहतो कैलासात । शंकर माझे नाव असत ।। जगाला समजून देण्या मी येत । सार्थक करून घ्या आपले ।।१०३।। पुष्कळ रंग या जगात । इथला रंग निराळा असत ।। हे गुह्य कुणाला न समजत । गुह्यात गुह्य असे हे ।।१०४।। जो स्वत:ला ओळखतो । तोच मला जाणू शकतो ।। सर्व ऐश्वर्य ओवाळून जरी टाकले । किंमत त्याची मुळी ना ।।१०५।। समजावून घे, जर समजेल । मागाहून पश्चात्ताप होईल ।। आमचे काहीच न बिघडेल । नुकसान आहे तुझेच ।।१०६।। लिहा दगडांच्या भिंतीवर । सुवर्णाक्षराने हे सुंदर ।। आठवतील वेळ आल्यावर । आमचे बोल सर्व हे ।।१०७।। प्रकांड पाण्डित्य महाराजांचे । देखून वंदन केले भावे वाचे ।। लेखन द्वादश अध्यायाचे । पूर्ण येथे जाहले ।।१०८।। ।। संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ।।

Search

Search here.