संस्कृत अर्धवाक्य लेखमाला 4


|| श्री गणेशाय नमः || 
संस्कृत सुभाषित ( अर्ध वाक्य ) लेखमाला 

लेख चतुर्थ   06 जुलै 2016 बुधवार 
लेखक अभ्यासक – श्री श्याम जोशी गुरुजी 

टिटवाळा  
गेल्या लेखांमध्ये आपण प्रसिद्ध अशा अनेक संस्कृत अर्ध वाक्यांचा उहापोह केला . आज सुद्धा अत्यंत प्रसिद्ध अशा संस्कृत वाक्य ( अर्धवाक्य ) विषयी मी सांगणार आहे . 
आजचे संस्कृत अर्ध वाक्य आहे —
*विनाशकाले विपरीतबुद्धिः*
सर्वाना सुपरिचित असलेले हे अर्धवाक्य सर्व जण एखाद्याचा विनाश किंवा मोठे भरून न येणारे नुकसान होणार असेल तर बुद्धी भ्रष्ट होते अशा साठी सर्रास वापरतात . म्हणजेच सरळ सरळ असा अर्थ घेतात की विनाशकाल जवळ आला की बुद्धी भ्रष्ट होते . 

आता या अर्ध वाक्याचे पूर्ण रूप आपण पाहू या . 
न भूतपूर्वो न च केन दृष्टो 

हेम्नः कुरङ्गो न कदापि वार्ता  |

तथापि तृष्णा रघुनन्दनस्य 

 *विनाशकाले विपरीतबुद्धिः*  ||

सोन्याचा हरिण पूर्वी कधी झाला नाही आणि कोणी पाहिला नाही. त्याची कोणालाही काहीहि माहिती नाही. तरीहि रामाला त्याचा लोभ पडला . विनाशकाळी बुद्धि उलटी फिरते . 
रामायणातील सुवर्ण मृग पकडण्याच्या प्रसंगावर आधारलेल्या या वाक्याचा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याफार शब्दफरकाने उल्लेख आहे . चाणक्य नीती ,  महाभारत तसेच काही काही मध्ययुगीन नीती सूत्रे , उपदेश सूत्रे या मध्ये हे वाक्य थोड्याफार शब्द फरकाने आलेले आहे . 

ती इतर पूर्ण रूपे सुद्धा आपण पाहुयात . 
1 )  न निर्मित: केन न दृष्टपूर्व: 

न श्रुयते हेममय: कुरन्ग 

तथापि तृष्णा रघूनंदनस्य 

*विनाशकाले विपरीत बुद्धी*  ||
2 ) न भूतपूर्वं न कदापि वार्ता 

हेम्नः कुरंगो न कदापि दृष्ट 

तथापि तृष्णा रघूनंदनस्य 

*विनाशकाले विपरीत बुद्धी*  ||
3 ) हेम्नः कुरंगो न कदापि दृष्ट 

असंभवं हेममृगस्य जन्म 

तथापि रामो लुलुभे मृगाय 

*विनाशकाले विपरीत बुद्धी:*  ||
सोन्याचा हरीण कधीच कोणीही पाहिला नाही व त्याचा ( अशा सुवर्णमृगाचा ) जन्म सुद्धा संभव नाही . हे ज्ञान असून सुद्धा रामाचे मन / बुद्धी विचलित झाली व सुवर्णमृगाचा लोभ धरला . विनाशाचा / मोठ्या संकटाचा काळ आला की बुद्धी अशीच फिरते / भ्रष्ट होते . 
वरील तीनही पूर्ण वाक्यांचा अशाच प्रकारचा अर्थ आहे . इथे विनाशकाळ याचा अर्थ विनाश असा न घेता मोठे संकट असा सुद्धा घ्यावा . तसेच मला असे वाटते की विनाशकाळ जवळ आला म्हणजे बुद्धी फिरते / भ्रष्ट होते असे म्हणण्या पेक्षा बुद्धी भ्रष्ट झाली की विनाशकाळ येतो असे म्हणणे जास्त संयुक्तिक वाटेल . बरोबर ना ?  बहुतेक हेच सुभाषितकारांना अभिप्रेत असेल . 
असो . चला तर मंडळी . उद्या पुन्हा एक नवीन अर्ध वाक्य घेऊन भेटू तोपर्यंत रजा घेतो . नमस्कार ?. शुभम् भवन्तु  … 
लेखक अभ्यासक — 

आपलाच — 

 © श्री श्याम जोशी गुरुजी 

टिटवाळा

या लेखमालेचा उद्देश –> अनेक वेळा बोलता बोलता आपण संस्कृत मधील एखादे छोटे सुभाषित , वाक्य बोलून जातो . परंतु ते सुभाषित – वाक्य एका मोठ्या सुभाषिताचा किंवा वाक्याचा छोटासा भाग असतो हे आपल्याला माहीत नसते . व्यवहारात ते छोटेसे वाक्य सदैव वापरात असल्याने स्मृतीत राहते व त्याचा पूर्णभाग विस्मृतीत जातो . आपण अशाच ( अर्ध ) वचनांचा – सुभाषितांचा अर्थासह उहापोह या लेखमालेत करणार आहोत .  तसेच संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार हा सुद्धा मुख्य हेतू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!