भोगी व मकरसंक्रांत
भोगी
भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा. दारासमोर रांगोळी काढावी. घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे.
या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.
इंद्र देवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते.
हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं.
भोगीचा सण अमावस्येला आला किंवा इतर दिवशी तरीही नेहमीप्रमाणे सण साजरा करावा . संक्रांतीचे अंगभूत कर्म असल्यामुळे सुगडे घेण्यास कोणतीही अडचण नाही . जर उपवासाचे दिवशी सण आला तर कुटुंबातील ज्या सदस्यांना उपवास आहे ते सदस्य सोडून इतर सर्वजण भोगी करू शकतात . उपवास वाल्यानी उपवासाचे पदार्थ खावेत , ते पूजन दान हवन वगैरे करू शकतात. तीळ सुद्धा खाऊ शकतात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी संक्रांतीला पण खाऊ शकतात .
१) मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांनी अर्थात स्त्री असो वा पुरुष, सूर्यादयापूर्वी स्नान करावे.
२) या दिवशी तीळ स्नानाचं अत्यंत महत्त्व आहे. याने रूप आणि आरोग्य लाभतं.
३) तिळाचे उटणे लावून स्नान केल्याने आरोग्य प्राप्ती होते.
४) या दिवशी तीर्थ स्थळी, मंदिर, देवळात देव दर्शन करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे.
५) या दिवशी स्नान झाल्यावर सूर्य देवतेची पूजा आराधना करावी.
६) तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन पाण्यात कुंकू, अक्षता, तीळ आणि लाल रंगाचे फूल घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
७) सूर्याला अर्घ्य दिल्यावर या दिवशी पाण्यात तीळ घालून पितरांना जल अर्पित करावे.
८) या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी वस्त्र, तूप, डाळ-तांदळाची कच्ची खिचडी आणि तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
९) नंतर पूर्व दिशेकडे मुख करून बसावे. समोर चौरंगावर पांढरा रंगाचा वस्त्र पसरवून त्यावर सूर्यदेवाचे चित्र, प्रतिमा किंवा यंत्र स्थापित करावे.
१०) पंचोपचार पूजन करून गुळाचा नैवेद्य दाखवावा.
११) पूजनात लाल फूल वापरावे. नंतर रक्त चंदनच्या माळेणे या मंत्राचा जप करावा.
ऊँ भास्कराय नम: ।।
ऊँ घृणि सूर्याय नम: ।।
असे संक्रांती व्यतिरिक्त दर रविवारी केल्याने सूर्य दोष नाहीसा होतो.
१२) या दिवशी गरिबांना भोजन खाऊ घातल्याने कधीही धनाची कमी होत नाही.
१३) या दिवशी गूळ आणि कच्चे तांदूळ पाण्यात प्रवाहित करणे शुभ मानले गेले आहे.
१४) या दिवशी खिचडी, तीळ-गूळ आणि शिजवलेल्या तांदळात गूळ आणि दूध मिसळून खाण्याने सूर्यदेव प्रसन्न होतात.
मकरसंक्रांति
॥ श्री गणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः ॥
स जयति सिंधुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् । वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम् ॥
सुर्य ज्याप्रमाणें सर्व अंधः काराचा नाश करतो, त्या प्रमाणें ज्याच्या चरण कमलांचे स्मरण सर्व विघ्नांचा नाश करिते, तो सिन्धुरवदन गजानन उत्कर्ष पावत आहे . तिलस्नायी तिलोद्वर्ती तिलहोमी तिलोदकी ।तिलभुक् तिलदाताच च षट्तिलाः पापनाशकाः॥ ( तिलमिश्रीत पाण्याने स्नान, तिलाचे उद्वर्तन उटणे अंगाला लावणे, तिलांचा होम तिलमिश्रीत पाणी पिणें, तिल भक्षण कराणे आणि तिलाचे दान करणें अशा सहा प्रकारें तिळाचा उपयोग केला असता सर्व पातक नाहीसें होतें ॥
ह्या पुण्यकालात शंकराचे देवळात तिळाच्या तेला चे दिवे लावावेत तीळ, तांदुळ यांनी शंकराची पूजा करावी शंकराला अभिषेक करावा सुर्यनारायणाला दुधाचा अभिषेक करावा .
संक्रांतीचा पुण्यकाल –
दरवर्षी जानेवारी “१४” किंवा “१५” तारखेस सूर्याचा “निरयन मकर” राशीत प्रवेश असतो. मकरेत प्रवेश झाल्यावर, त्याच्या “पुण्य / पर्वकाला”चे दिवशी, “मकर संक्रांति” सण साजरा केला जातो. ह्या दिवशी तिळगूळ दान करण्याचे व खाण्याचे महत्व आहे.
मकर संक्राति व इंग्रजी दिनांक : –
मकर संक्रांति ही सूर्याने “निरयन मकर” राशीत प्रवेश करण्यावर अवलंबून आहे. ती “१४ जानेवारी”ला येते असे मात्र मुळीच नाही. सूर्याने एकदा “निरयन मकर” राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो “मकर” राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस, ०६ तास, ०९ मिनिटे, ०९.५४ सेकंद एवढा कालावधी लागतो. सांप्रत “सूक्ष्म वेधांनी प्रत्यक्ष अनुभवास” (“दृक् प्रत्यय तुल्य”) येणारा हा कालावधी आहे.
हीच “दृक् प्रत्यय तुल्य गणित (सूक्ष्म गणित) पध्दती” दाते पंचांगकर्ते, सोलापूर, ह्यांनी शके १८७२ (इ.स. १९५०-५१ पासून स्वीकारली आहे. म्हणूनच “दाते पंचांगा’तील ग्रह गणित अचूक असते.”
“प्लुत” (“लीप”) वर्षातील फेब्रुवारीच्या २९ दिवसांमुळेच, ही मकर संक्रांति अनेक वर्षे एका तारखेला येते.
इसवी सन १८९९ मध्ये निरयन मकर संक्रांति “१३” जानेवारीला आली होती.
*इ. स. १९७२ पर्यंत संक्रांति “१४” जानेवारीला येत होती. इ. स. १९७२ पासून २०८५ पर्यंत संक्रांति कधी “१४” जानेवारीला तर कधी “१५” जानेवारीला असणार आहे. इ. स. २०८५ पासून २०९९ पर्यंत संक्रांति “१५” जानेवारीला असेल. त्यानंतर इ. स. २१०० पासून संक्राति “१६” जानेवारीला येईल.
मकरसंक्रांती 2022
शके १९४३ शुक्रवारी 14 जानेवारी 2022 , पौष शु. द्वादशी रोजी दुपारी २:२९ वा. सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे . संक्रांत बालव करणावर असून वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे . तिने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतलेली आहे . केशराचा टिळा लावलेला आहे . वयाने कुमारी असून बसलेली आहे . वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे व पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे . सर्प जाती आहे . भूषणार्थ मोती धारण केले आहे वारनाव मिश्रा असून नाक्षत्र नाव नंदा आहे . उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असून नैऋत्येकडे पहात आहे . संक्रांति ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख व क्लेश होतात . संक्रांति काळात स्नान , दानधर्म , नामस्मरण असे पुण्य कृत्य केले असता फल शतपट होते .
*संक्रांति पर्व काळात स्त्रीयांनी करावयाची दाने*
देश काल कथन करून
*” मम् आत्मन: सकल पुराणोक्त फल प्राप्तर्थ्य श्री सवितृ प्रीतीद्वारा सकल पापक्षय पूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युदय सुख संपदादि कल्पोक्त फल सिद्धये अस्मिन मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय ( अमुक ) दानं करिष्ये “*
असा संकल्प करून दान वस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे व दक्षिणा द्यावी .
*पर्व काळातील करावयाची दाने*
नवे भांडे , गाईला घास , अन्न , तीळपात्र , गुळ , सोने , भूमी , गाय , वस्त्र , घोडा , इत्यादी यथाशक्ती दान करावे .
*जन्मनक्षत्रा वरून संक्रांतीची शुभाशुभ फले*
१) कृतिका , रोहिनी , मृग :- प्रवास .
२) आर्द्रा , पुनर्वसु , पुष्य , आश्लेषा , मघा , पूर्वा :- सुख , सौख्य .
३) उत्तरा , हस्त , चित्रा :- रोग – आजार .
४) स्वाती , विशाखा , अनुराधा , ज्येष्ठा , मूळ , पूर्वाषाढा :- वस्त्र लाभ .
५) उत्तराषाढा , श्रवण , धनिष्ठा :- नुकसान .
६) शततारका , पूर्वाभाद्रपदा , उत्तराभाद्रपदा , रेवती , अश्विनी , भरणी :- उत्तम द्रव्य लाभ .
*संक्रांतीचा पर्वकाळ १४ जानेवारी शुक्रवार दुपारी २:२९ पासून सूर्यास्तापर्यंत आहे .*
या दिवशी तिळाचे उटणे अंगास लावणे , तिलमिश्रित उदकाने स्नान , तिलहोम , तिलतर्पण , तिलभक्षण , तिलदान केले असता सर्व पापांचा नाश होतो .
करिदिन : – मकर संक्रातींच्या “दुसरे” दिवसाला “करिदिन” अशी शास्त्रीय संज्ञा आहे. मकर संक्रातीचा “पुण्य / पर्वकाल” व त्याचे पुढील “करिदिन” हे सर्व शुभ कर्मांना वर्ज्य करावे. असे शास्त्र सांगते. यामध्ये देवकर्मे , संक्रात प्रित्यर्थ पूजन हवनकर्मे करू शकतात. पण शुभकर्म म्हणजे उद्घाटन , शुभारंभ , साखरपुडा , गृहप्रवेश इत्यादि इत्यादी ..
यानियानिच वस्तूनी संक्रांतिः स्वीकारोतिच । तत्तन्महर्घं वा नाशः क्रय विक्रय भीतिदा । आगमे च भवत्सौखं गमने दुःखदाय कम् । दर्शनेच भवद्धानिः संक्रांति फलमादिशेत् ॥
संक्रांत जी जी वस्तु धारण करते ती महाग होते व संक्रांत ज्या दिशे कडुन येते तिकडे सुख व ज्या दिशे कडे जाते व पहाते तिकडे अनिष्ट फल समजावें . संक्रातीचा जो रंग असेल तो आपण धारण करू नये , तसेच त्या गमन दिशेला प्रवास करू नये..
*संक्रांतिपर्वकालामध्ये वर्ज्यकर्माणि * दन्ता न शोध्याः पुरुषं न वाच्यं छेद्यं न किचिंतृणदारुपुष्पम् ।दोह्यो न गोऽजामहिषीसमा जो भोज्यं च वर्ज्यं मदनो न सेव्यः ॥
( संक्रांतीच्या पर्वकाळांत दांत घासणें, कठोर बोलणें, वृक्ष व गवत तोडणें, फुल खुडूं नये,गायी, म्हशी, शेळ्या ह्यांचे दूध काढू नयें, भोजन करु नये व कामविषय सेवन हीं कामें करुं नयेत . )
*संक्रांतौ आवश्यकानि दानानि * सौम्यायनेनूतन भाण्डदानं गोग्रासमन्नं तिल पात्रदानम् । गुडं तिलोर्णाज्य सुवर्णंभूमिगोवस्त्रवाजिप्रभृतींश्र्च दद्यात् ॥ नवे भाडें, गाईला चारा, अन्न, तिळ भरुन भांडे, तिलपात्र, लोंकरिचें वस्त्र, गुळ, तीळ, सोनें, भूमि, गाय, वस्त्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावी . वस्त्राचें दान द्यावे व तिळा सह वृषभदान करावे . तिळ व गुळ इष्टमित्रास द्यावा म्हणजे स्नेहसंवर्धन होते … संक्रांतिच्या पर्वकाळात सौभाग्यवती स्त्रियांनी दाने द्यावयाची असतात .
संक्राति “पुण्य / पर्वकालात” स्त्रियांनी करावयाची “दाने / सौभाग्यवायने” : – हळद, कुंकू, बांगड्या, आरसा, खण, नारळ, सौभाग्यवायने, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ, तिळपात्र, गूळ, कपडे, तूप, फळे, तिळाचे लाडू, उपयुक्त असणाऱ्या वस्तू इत्यादी.
*दानफलम्*
संक्रांतौ यानि दत्तानि हव्यकव्यानि दातृभिः। तानि नित्यं ददा त्यर्कःपुनर्जन्मनि जन्मनि ॥ रविसंक्रमणे प्राप्ते न स्नाया द्यस्तु मानवः । सप्त जन्मनि रोगी स्यान्निर्धनश्चैव जायते सूर्यसंक्रांति दिवसे ब्राह्मणं यो न भोजयेत् । स सप्त जन्मपर्यंतं क्षयरोगी भविष्यति । संक्रांतिसमये दानं स्वशक्त्या न करोति यः । स दरिद्रोमहापापी प्रति जन्मनि जायते ॥ इतीदं संक्रमफलंतस्मात्पाक्परतोऽपि वा । शृणुयात्पुत्रपौत्राद्यै र्मोदते सुचिरं भुवि ॥
( संक्रांतीच्या पुण्यकालामध्यें किंवा संक्रांतीच्या निमित्ताने जी जी दानें दिली किंवा देवकार्य, पितृकार्य केले तें तें सूर्य आपणाला जन्मोजन्मी नित्य देतो . सूर्यसंक्रांति आली असतां जो मनुष्य यथाविधी स्नान करीत नाहीं, तो सात जन्म पर्यंत निर्धन व महापापी होते . संक्रांतीच्या पुण्य कालामध्ये यथाशक्ति दाने जो करीत नाही तो प्रत्येक जन्मात दरिद्री व महापापी होतो . हें संक्रांति फल संक्रांतीच्या पूर्वी किंवा नंतर जे श्रवण करितात तें पुत्रपौत्रादिकां सह निरंतर पृथ्वी वर आनंदाने राहतात . )
*श्रवणफलम्* ये वात्र्छन्तिसुखं सदैव परमं लक्ष्मींच रोगक्षयम् । लावण्यादिगुर्णैर्युतं वरवपुर्भा र्यां मनोहारिणीम् । स्वानन्दं पशुपुत्रपौत्र सहितं किर्तेश्र्च वृद्विं कुले । तैः श्रोतव्यंमिदं तु सक्रमफलं देयं सृपात्रे धनं॥
( ज्यांना नेहमीं सुख, संपत्ती, आरोग्य, सौंदर्यादि गुण, सशक्त शरीर, मनोहर स्त्री, पशु , पुत्र, नातु , इत्यादिकांसह आनंद व कीर्ति ह्यांची आपल्या कुला मध्यें वृध्दि व्हावी अशी इच्छा असेल त्यांनीं हे संक्रांतिफल अवश्य ऐकावें व दान करणे तर सत्पात्रीं करावें . )
सर्वांना संक्रांतीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा..