महाकवी कालिदास mahakavi kalidas

​कविकुलगुरू कालिदास …. 
भारतीय साहित्याचीच नव्हे तर जागतिक साहित्यामधील सर्वश्रेष्ठ विभूती … 

प्राचीन भारतीय इतिहासाचे प्रतिनिधिक दृश्यमान कवी .. उत्तराखंड मधील उज्जैन जवळील कविल्ठ या स्थानी जन्मला असे मानले गेलेला हा कवी .. 

भारतीय साहित्याचे सर्वश्रेष्ठत्वाचे कालिदासाच्या लेखनात आहेत ..

नुसते हिंदुस्थानने नाही तर सर्व विश्वाने सुद्धा कालिदासाची गणना जगातील सर्वश्रेष्ठ कवी म्हणून केली आहे .. जगातील कोणताही कवी अजूनपर्यंत कालिदासाच्या लेखनाशी बरोबरी करू शकला नाही हे साऱ्या विश्वाने मान्य केले आहे .. 

म्हणूनच कालिदासाच्या लेखनावर मंत्रमुग्ध झालेला जर्मन कवी व समीक्षक गटे / गोएथ  ( Goethe ) म्हणतो की शेक्सपिअर ची सर्व नाटके एकत्र करून सुद्धा कालिदासाच्या एका नाटकाशीही बरोबरी करू शकत नाही .. विस्मयचकित झालेला गटे ( Goethe ) व ईस्टवीक ( E B Eastwick ) कालिदासाच्या  लेखना विषयी म्हणतात की स्वर्गीय सुख व पूर्ण समाधान काय असते हे फक्त कालिदासाचे नाटकच दाखवू शकते .. 

कालिदासाच्या लेखनातील अत्युच्च शैली , सुंदरता , माधुर्य , डोळ्यांसमोर उभे राहणारे सुमधुर वर्णन , विषयाची श्रेष्ठ हाताळणी हे सर्व पाहून एका मर्मज्ञ टिकाकाराने अशा प्रकारे प्रशांसापूर्वक उद्गार काढले आहेत .. 
पुराकवीनां गणना प्रसंगे कनिष्टीकाधिष्टीत कालिदास:  | 

अद्यापितत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव  ||   
पूर्वी अत्युत्कृष्ट कवींची गणना करतेवेळी कनिष्टीकेवर प्रथम कालिदासाचे नाव घेतले पण दुसऱ्या बोटावर कोणाचे नाव घ्यायचे हेच ठरेणा कारण दुसरा कोणीच त्याच्या तुलनेचा –  तोडीचा आढळला नाही म्हणून मग त्या बोटाचे नाव अनामिका च राहिले .. 
उत्कृष्ट सादरीकरण , हृदयस्पर्शी वर्णन , विलक्षण शैली , वेगवेगळे पद्यछंद , भावनात्मक माधुर्य , लेखनशैली ची अपूर्वता , कोमलता , रसिकता , सरलता असे अनेकविध गुण कालिदासाच्या लेखनात आढळतात आणि लेखन नीट मनापासून वाचणारा मंत्रमुग्ध ,  भावविवश होतो .. 

प्राचीन साहित्य , इतिहास भाषा परिस्थिती चा अभ्यास संशोधन करणारांना कालिदासाचे परिपूर्ण लेखन अत्यंत आधारभूत ठरते .. 
कविकुलगुरू कालिदासांची लेखनसंपदा –> 
1 ) कुमारसंभवम्  — सध्याच्या काळात या काव्याचे 18 सर्ग उपलब्ध आहेत .. यातील प्रथम 8 सर्गच कालिदासाने लिहिली आहेत व नंतरची प्रक्षिप्त आहेत अशी मान्यता आहे . यामध्ये पार्वतीचा जन्म , रतिमदन कथा , शिवपार्वती विवाह व नंतर कार्तिकेयाचा जन्म व त्यानंतर त्याने केलेला तारकासुर वध असे अद्भुत वर्णन आहे .. 
2 ) ऋतूसंहार —  या मध्ये ग्रीष्मादी षड्ऋतूंचे  अत्युत्तम असे वर्णन असून एकूण एकशे अठ्ठावन्न श्लोक यात आहेत . हे एक श्रेष्ठ असे निसर्ग काव्य आहे .. 
3 ) मेघदूत  —  अत्यंत उच्च शैली रचना असलेले हे एक खंडकाव्य .. नवविवाहित तरुण यक्ष यक्षराज कुबेराच्या शापामुळे आपल्या  पत्नीपासून दूर जातो पण पत्नीचा विरह सहन न झाल्यामुळे तिच्या आठवणीमुळे व्याकुळ झालेला तो यक्ष मेघाकरवी आपला प्रेम संदेश पाठवतो असे यात सुमधुर वर्णन आहे .. 
4 )  रघुवंश  —  हे सुद्धा श्रेष्ठ असे काव्य होय .. एकूण एकोणीस सर्ग असलेल्या या काव्यात रघुराजा , दिलीप , राजा रामचंद्र आदी रघुवंशा चे चरित्र वर्णन आहे .. रघुवंश ही कालिदासाची अद्भुत अद्वितीय अशी अंतिम रचना .. यानंतर कालिदासाची कोणतीच रचना नाही .. अत्यंत भावपूर्ण , सर्व रसांनी परिपूर्ण ,  सर्वश्रेष्ठ अशी अवर्णनीय रचना .. कारण या रघुवंशावर एक दोन नव्हे तर तब्बल तेहतीस टीका समीक्षा ग्रंथ  लिहिले गेले , यावरूनच याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते .. 
अशाच प्रकारे या व्यतिरिक्त एकूण चाळीस रचना कालिदासाच्या आहेत .. 

मालविकाग्निमित्र , विक्रमोर्वशियम् , अभिज्ञान शाकुंतलम् , श्रुतबोधम् , कर्पूरमंजरी , शृंगारतिलकम् , पुष्पबाणम् , शृंगाररसशतम् ,  श्यामादंडकम् , सेतुकाव्यम् , ज्योतिर्विद्याभरणम् 
कालिदास एक उत्तम ज्योतिषी सुद्धा आहे असे मानण्यात येते .. ज्योतिर्विद्याभरणम् हा त्याने रचलेला एक ज्योतिष ग्रंथ आहे .. तसेच उत्तरकालामृत हा एक ज्योतिषग्रंथ कालिदासाने लिहिला असे मानण्यात येते .. यातील अनेक ग्रंथांचा फक्त उल्लेख अनेक ठिकाणी असून यातील काही ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत .. 
परदेशी भाषांमध्ये भाषांतरीत होऊन प्रकाशित झालेले प्रथम भारतीय साहित्य हे कालिदासाचेच … 

कवी लेखक कसा असावा याबद्दल जगद्गुरू आद्य शंकराचार्य विवेकचुडामणीत लिहितात —

वाग्वैखरी शब्दझरी शास्त्रव्याख्यान कौशलम् 

वैदुष्यं विदुषां तद्वद भुक्तये न तु मुक्तये  || 
वाक्चातुर्य , शब्दप्रभुत्व , शास्त्रव्याख्यान यामध्ये कौशलता असलेला बुद्धिवान कवी असेल पण जो या बुद्धीच्याही पलीकडील भुक्ती मुक्तीची स्थिती जाणतो , भगवंताची लीला अनुभवतो तोच खरा महाकवी .. 
आणि हे विशेषण पूर्णपणे कालिदासाला लागू पडते. म्हणूनच सर्व जग त्याला महाकवी म्हणून संबोधतात .. 

जाता जाता कालिदासा संबंधीत सत्य मानली गेलेली – प्रचलित असलेली एक कथा — 

दंडी आणि कालिदास या दोघांत श्रेष्ठ कोण असा प्रश्न उत्पन्न होतो . तेव्हा हे दोघे माता  सरस्वती च्या मंदिरात जातात आणि आपले सर्व  लिखित साहित्य गर्भगृहात ठेवून दार लावून घेतात . नंतर काही वेळाने दार उघडल्यावर असे दिसून येते की दंडी चे साहित्य सर्वात प्रथम स्थानावर असून कालिदासाचे साहित्य तेथे नसते . तेव्हा आर्ततेने कालिदास मातेला विचारतो कि आमच्यात श्रेष्ठ कोण ? तेव्हा सरस्वती उत्तर देते , दंडी .. तेव्हा दुःखाने कालिदास विचारतो कि मग मी का श्रेष्ठ नाही व माझे लिखित कुठे आहे ? तेव्हा सरस्वती उत्तर देते – त्वमेवाहं  … म्हणजे कि आपण दोघे वेगळे नाही आणि तुझे लिखित मला खूप आवडले म्हणून मी माझ्याकडे घेतले आहे .. 

तर अशा या अखीलजगतातील सर्वश्रेष्ठ महाकवीला आज आषाढ प्रथम दिनानिमित्त कोटी कोटी नमन .. 
लेखक — © श्री श्याम जोशी गुरुजी 

टिटवाळा 

05 july 2016 Monday 

 संदर्भ — संस्कृत साहित्य , विकिपीडिया , कालिदासस्य चरितम् , आंतरजाल … 

10 thoughts on “महाकवी कालिदास mahakavi kalidas

  • July 12, 2016 at 7:53 pm
    Permalink

    sundar mahiti ahe

    Reply
  • April 25, 2017 at 10:26 am
    Permalink

    भारत एक खोज मध्ये महाकवि कालिदास व त्यांच्याच लिखित अभिग्यात् शाकुंतलम् नाटिकेचे मिश्रण स्वरुप दोन एपिसोड आहेत. मेघदुतम् त्यांची स्वत:ची विरह पिडी आहेय काय..!?!

    Reply
  • June 22, 2020 at 2:41 am
    Permalink

    Shyam Guruji, khup chan , Kavi Kalidas yanche sahitya vivechan marathi madhe arthasahit aahe ka??

    Reply
  • July 11, 2021 at 4:09 am
    Permalink

    केवळ आणि केवळ अप्रतिम असंच या लेखा बद्दल म्हणता येईल ।।।
    खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती यातून सर्वांना उपलब्ध होण्यास मदत झालेली आहे।।।

    Reply
  • June 30, 2022 at 9:40 am
    Permalink

    उत्कृष्ठ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    Reply
  • June 30, 2022 at 1:29 pm
    Permalink

    श्री श्याम जोशी यांना मनःपूर्वक धन्यवाद, उत्तम सर्वांकष पण संक्षिप्त माहिती दिलीत
    धनंजय नावाचा एक कवी कालिदासाचा द्वेष करीत असतो, तो राजा भोजाला एक पत्र लिहितो, तो म्हणतो
    अपशब्द शतं माघे, भारवे च शतत्र्यत्रयमl
    कालिदासे न गण्यन्यांते,कविरेको धनंजय:ll
    अर्थ: माघ कवीच्या साहित्यात 100 अपशब्द आहेत, भारव कवीच्या 300, कालिदासाच्या साहित्यात अगण्य अपशब्द वा शिव्या आहेत, मात्र धनंजय म्हणजे माझ्या साहित्यात एकच अपशब्द आहे तोही या श्लोकात आलाय तोच एकमात्र
    धनंजय हे पत्र एकाच्या बरोबर भोज राजाला द्यायला पाठवतो, रस्त्यात कालिदासाला तो माणूस भेटतो, कालिदास त्याला विचारतो कोठे निघालास? तो सांगतो, हे पत्र द्यायला राजाकडे निघालोय, कालिदास ते पाहायला मागतो, कालिदासाच्या हे कारस्थान लक्षात येतं, तो त्या माणसाला म्हणतो अरे यात एक मोठी चूक झाल्ये, अपशब्द नाही, आपशब्द हवे, एक कान्हा चुकून राहिलाय, तो कान्हा कालिदास add करतो आणि श्लोकाचा अर्थ पूर्ण बदलतो,कारण आप म्हणजे पाणी
    नवा अर्थ: माघ कवीच्या साहित्यात पाण्यासाठी 100,भारवच्या 300 ,कालिदासाच्या अगण्य समानार्थी शब्द आहेत, तर धनंजयाच्या फक्त 1 शब्द तो या श्लोकात आहे तेव्हढाच
    अशा तर्हेने धनंजयाचा डाव त्याच्यावरच उलटतो आणि त्याची नाचक्की होते

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!