मकरसंक्रांत भोगी किंक्रांत
🌹 *मकर संक्रांत* 🌹
मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०२५
शके १९४६ मंगळवार , पौष कृ. प्रतिपदा म्हणजे 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी ०८:५५ वा. सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे . संक्रांत बालव करणावर असून वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे . तिने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतलेली आहे . केशराचा टिळा लावलेला आहे . वयाने कुमारी असून बसलेली आहे . वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे व पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे . सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केले आहे वारनाव व नाक्षत्रनाव महोदरी असून सामूदाय मुहूर्त ४५ आहेत . पूर्वेकडून पश्चिमकडे जात असून वायव्य दिशेला पहात आहे . संक्रांति ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख व क्लेश होतात . असे मानले जाते व अनुभवास येते. संक्रांति काळात स्नान , दानधर्म , नामस्मरण असे पुण्य कृत्य केले असता फल शतपट होते . संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे , कठोर बोलणे , वृक्ष , गवत तोडणे , गाई म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत .
*संक्रांति पर्व काळात स्त्रीयांनी करावयाची दाने*
देश काल कथन करून
*” मम् आत्मन: सकल पुराणोक्त फल प्राप्तर्थ्य श्री सवितृ प्रीतीद्वारा सकल पापक्षय पूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युदय सुख संपदादि कल्पोक्त फल सिद्धये अस्मिन मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय ( अमुक ) दानं करिष्ये “*
असा संकल्प करून दान वस्तूचे व ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे व दक्षिणा द्यावी .
*पर्व काळातील करावयाची दाने*
नवे भांडे , गाईला घास , अन्न , तीळपात्र , गुळ , तीळ , सोने , भूमी , गाय , वस्त्र , घोडा , इत्यादी यथाशक्ती दान करावे .
*जन्मनक्षत्रा वरून संक्रांतीची शुभाशुभ फले*
१) आर्द्रा , पुनर्वसु , पुष्य :- प्रवास .
२) आश्लेषा , मघा , पूर्वा , उत्तरा , हस्त , चित्रा :- सुख , सौख्य .
३) स्वाती , विशाखा , अनुराधा :- रोग – आजार .
४) ज्येष्ठा , मूळ , पूर्वाषाढा , उत्तराषाढा , श्रवण , धनिष्ठा :- वस्त्र लाभ .
५) शततारका , पूर्वाभाद्रपदा , उत्तराभाद्रपदा :- नुकसान .
६) रेवती , अश्विनी , भरणी , कृत्तिका , रोहिणी , मृग :- उत्तम द्रव्य लाभ .
*संक्रांतीचा पर्वकाळ १४ जानेवारी मंगळवारी सकाळी ८:५५ पासून दुपारी ४:५५ पर्यंत आहे .*
या दिवशी तिळाचे उटणे अंगास लावणे , तिलमिश्रित उदकाने स्नान , तिलहोम , तिलतर्पण , तिलभक्षण , तिलदान केले असता सर्व पापांचा नाश होतो .
या दिवसाचे कर्तव्य किंवा कामे—-सकाळी तिलमिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.*
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.*
नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.
*लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात. मुरमुरे / चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते खरेतर ते चुकीचे आहे पण अर्थात कालाय तस्मै नमः .. निदान त्यात देशी शुद्ध सात्विक गोळ्या चॉकलेट असलेले उत्तम राहील… याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.*
मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.
मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते.
भोगी:-
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात.
दि. १३/०१/२०२५ रोजी सोमवारी पौष पौर्णिमा ह्या दिवशी भोगी हा सण आहे.
ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी म्हणजे गाजर – मटार वाटाणे – फरसबी – वाल वगैरे शेंगभाज्या – फ्लॉवर इत्यादी इत्यादी ), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण उत्सव म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.
पुजा साहित्य:-
पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हण अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.
पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.
संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते.
मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.
मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तीळ-गुळ घ्या गोड बोला” तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.
संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्टात पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, गोळ्या चॉकलेट मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.
संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी कीक्रांत असते. त्यादिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणते ही काम करू नये.
किंक्रांत:-दि १५/०१/२०२५ रोजी बुधवारी पौष कृष्ण २ ला दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन असतो. ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत ह्या दिवशी अजुन किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.
यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे
इ स १९७२ सालापासून सन २०८५ पर्यंत मकर संक्रांत कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून मकर संक्रांत १६ जानेवारीला येईल. तर ३२४६ मध्ये मकर संक्रांत चक्क १ फेब्रुवारीला साजरी केली जाईल, अशी रंजक माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासकाची यांची आहे.
त्यामुळे मकर संक्राती पुण्यकाळ यावेळी १४ जानेवारी रोजी आली असल्याचे त्यांनी सांगितले. नेहमी मकर संक्रांती १४-१५ जानेवारीलाच येते. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास, नऊ मिनिटे व दहा सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या वर्षी `लीप वर्ष’ धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो.
सन १८९९ मध्ये निरयन मकर संक्रांती १३ जानेवारीला आली होती. सन १९७१ पासून सन निरयन मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांती कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल. अशा रितीने पुढे सरकत सरकत ३२४७ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार असल्याचे सोमण यांनी सांगितले आहे.
मकर संक्रांती ही वाईट नसते. `संक्रांत आली’ हा शब्दप्रयोगही आपण चुकीच्या अर्थ वापरत असतो. दिनमान वाढत जाणे, त्याच दिवशी, शिशिर ऋतुचा प्रारंभ झाला. मकर राशीला तीळगुळ देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करतो. मकर संक्रांतीच्या वेळी काही अफवा पसरवितात त्यावर विश्वास ठवू नका तसेच अफवा पसरवू नका असे आवाहनही मी करतो ही विनंती आहे
हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत करता येते.
संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व:-
या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।
( मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येकास देतो
मकरसक्रांतीचे पौराणिक महत्त्व
मकरसंक्रांतीच्याच दिवशी गंगा नदीचे आगमन झाले पृथ्वीवर झाले होते अशी आख्यायिका आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहाचा स्वेच्छाने त्याग केला होता. दक्षिणायनमध्ये जर आपल्या देहाचा आपण त्याग केला तर आपल्याला गती मिळणार नाही अशी भीष्मांची आस्था होती. त्यामुळेच त्यांनी उत्तरायण हा काळ निवडला होता. उत्तरायणाचे सहा महिने हे शुभ असतात असे भगवद्-गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटले आहे.
एकमेकातील हेवेदावे वैर व भांडण विसरून तिळगुळ देऊन उत्साह आनंदाने सण साजरा करावा .. अर्धवट खोट्या अफवांना , चुकीचे माहिती देणाऱ्या पासून सावध रहा , घाबरु नका..
तिळगुळ घ्या व गोड बोला .
आपलाच धर्मसेवक 🚩🙏
श्री श्याम जोशी गुरुजी