शारदीय नवरात्र
श्री घटस्थापना व नवरात्र माहिती
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असे म्हणतात.
नवरात्रात जवळपास अनेक घरांमध्ये घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. सकाळी , संध्याकाळी , रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्र म्हटली जातात.
आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठा उत्सव असतो , मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात.
ह्या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी आहे. ह्या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते.
ही शक्ती देवता देशभरांत अन् वेगवेगळ्या भागांत विविध नावांनी ओळखली जाते.
● देवी कां प्रकट अन् कशी प्रकट झाली? ह्या बद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात खालील उल्लेख येतो :-
पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर नावाचा राक्षस फार माजला होता. त्यानं देवता, ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होतं. तो सर्वांनाच फार त्रास देत होता.
तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली.
त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.
● देवीची नऊ रूपे –>
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडा ( किंवा कुष्मांडी ) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
● व्रत पूजन करण्याची पद्धत –
नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.
● घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी. किंवा घरात एका योग्य शुद्ध ठिकाणी जमिनीवर पाट / चौरंग ठेवून त्यावर एक पत्रावळ ठेवून त्यावर मातीचे मोठे पसरट पात्र ठेवावे व त्यात काळी – लाल माती टाकावी . पाट चौरंग न घेता पत्रावळीवरच माती घेतली तरी चालेल . त्यात आपल्या रीती परंपरेनुसार प्रथेनुसार धान्य टाकावे.
{ त्यात पाच किंवा सात धान्ये घालावीत. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत. एखादे उपलब्ध नसल्यास हरकत नाही , जे उपलब्ध असेल ते घ्यावे }
● मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने, कमलबीज, नाणे इत्यादी जेवढे शक्य असेल त्या वस्तू अर्पण करणे.
● सप्तधान्ये आणि कलश (वरुण) स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशावर तांब्याचे टाऊनमध्ये तांदूळ ठेवून त्यात देवीचे जे जे रूपातील प्रतिमा मूर्ती असेल ( अन्नपूर्णा / लक्ष्मी / टाक असे मूर्ती / लक्ष्मीकॉईन्स इत्यादी ) यांची स्नानादी अभिषेक करून स्थापना करणे. यावर इतर कोणतेही देव ( गणपती श्रीकृष्ण वगैरे ) स्थापन करू नये . नवरात्र काळात घाटावर फक्त देवीस्वरूप स्थापना होते इतर देव नाही. बाकीचे देव नेहमीच्या जागेवर असतील. स्थापणा झालेल्या देवीला रोज जुनी फुले – गजरा वगैरे काढून घेणे व नवीन फुले गजरा हळद कुंकू वगैरे अर्पण करणे. इतर देवांची मात्र नेहमीप्रमाणे अभिषेक पूजा वगैरे करणे.
नवरात्री काळात या कलशावर रोज माळ येईल अशी बांधावी. काही ठिकाणी देवी ऐवजी नारळ ठेवतात व देवी दुसरीकडे आठपणा करतात . आपापल्या घरातील परंपरेप्रमाणे करावे.
● नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन द्यावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते. जर प्रत्येक दिनी शक्य नसेल तर एकाच दिवशी किंवा जसे जमेल तसे कुमारिका सुहासिनी पूजन करणे , त्यांना उपयोगी वस्तू देणे.
● त्या त्या देवतेचे माहात्म्यपठन ( चंडीपाठ / सप्तशतीपाठ ) देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, नऊ दिवस उपवास करणे जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रमहोत्सव साजरा करावा.
शक्य असल्यास रोज किंवा तीन दिवस किंवा निदान एकदातरी गुरुजींकडून नऊ / सात / पाच / तीन किंवा निदान एक तरी सप्तशती पाठ वाचन करून घेतल्यास सर्वोत्तम. तसेच स्वतः सुद्धा रोज सकाळी संध्याकाळी देवीक्सचे विविध स्तोत्र मन्त्र जप वगैरे करावे ..
● नवरात्रातील नऊ माळा –>
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची काही ठिकाणी प्रथा आहे. कोणाकडे रोज एकच फुलांची माळ असते .. एखादी प्रथा पद्धत आपल्याकडे नसताना उगीच चालू करू नये .
◆ पहिली माळ – शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ
◆ दुसरी माळ – अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढर्याआ फुलांची माळ.
◆ तिसरी माळ – निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.
◆ चौथी माळ – केशरी अथवा भगवी फुले. अबोली , अशोक किंवा तिळाची फुले.
◆ पाचवी माळ – बेल किंवा कुंकवाची वाहतात. उपलब्ध फुले कुंकवामध्ये बुडवून त्याची माळ अर्पण करणे.
◆ सहावी माळ – कर्दळीच्या फुलांची माळ.
◆ सातवी माळ – झेंडू किंवा नारिगी फुले.
◆ आठवी माळ – तांबडी फुले. कमळ,
जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
◆ नववी माळ – कुंकुमार्चनाची वाहतात. फुले कुंकवात बुडवून
● अखंड दीपप्रज्वलन करणे. तीळ तेल किंवा जे आपण वापरतो ते तेल घ्यावे. दिव्यातील तेलात / तुपात जर थोडासा शुद्ध भीमसेन कापूर टाकला तर अत्यंत उत्तम.. दिव्याखाली आसन म्हणून पान / तांब्याची किंवा जे असेल ते ताटली असावी.
दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.
नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे
नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा. देवीला दाखवलेला नेवैद्य उपवास नसलेल्या व्यक्तीने भक्तिभावाने ग्रहण करणे .. घरातील सर्वांचा उपवास असल्यास तो नेवैद्य गायीला देणे / नदीत अर्पण करणे. अनेक ठिकाणी देवीला रोज वेगवेगळे फळ नेवैद्य म्हणून अर्पण करतात व नंतर सर्व जण प्रसाद म्हणून ते घेतात. सकाळचे फळ संध्याकाळी व संध्याकाळचे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद म्हणून घ्यावे.
● ओटी –>
देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. जी साडी आपण देवीला देतो ती नऊवारी किंवा निदान सहावारी असावी .. सध्या बाजारात देवी साड्या येतात त्या तोकड्या – छोटे तुकडे अर्पण करू नये.
दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण / ब्लाउजपीस व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी
साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो. ( वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. आपल्या रीती परंपरेनुसार करावे )
● त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा. शक्यतो देवीला अर्पण केलेले वस्त्र गुरुजींना ( म्हणजेच त्यांच्या पत्नीला ) दान द्यावे .. किंवा एखाद्या सुहासिनीला द्यावे. शक्य असल्यास गुरुजी – सुहासिनी व इतर सुद्धा अजून कोणी आशा अनेकांना वस्त्र दिले तरी चालेल.
● कुमारिका-पूजन कसे करावे ?*
नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. { वय वर्षे एक पासून नऊ पर्यंत } `नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी `नऊ” या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.
कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे.
त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.
देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी पुरण वगैरे आवडते.)
कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.’ किंवा उपयोगी वस्तू द्याव्यात.
रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीचे विविध स्तोत्र पठण , मन्त्र जप नामस्मरण करावे ,
देवीची आरती व भजन करून श्री भगवतीचे चिंतन करावे
रोज देवीच्या मंगलमय अश्या पुजन व आरती करताना सुगंधित गुग्गुळ चा दोन्ही वेळा धुप करावा या मुळे वातावरण शुद्धी व पवित्रता निर्माण होते …. ( देवीला गुग्गुळ धूप विशेष प्रिय आहे )
नवरात्रीच्या पवित्र दिवसामध्ये आपल्या श्रीकुलदेवीचे नामस्मरण अवश्य करावे , तसे तर रोजच करावे .. पण या दिवसात अधिक फलदायी..
अनेक ठिकाणी याकाळात देवीकृपा प्राप्ती साठी चंडीपाठ – होम हवन केले जाते.
● जगदंब उदयोस्तु ●
श्री श्याम जोशी गुरुजी
संदर्भ – देवी भागवत ग्रंथ , इतर ग्रंथ – पुराण …